काही गाणी आठवणीतली, काही गाणी साठवणीतली!
वर्षानुवर्षे श्रोत्यांच्या मनात घर करून राहिलेली आणि वारंवार ऐकूनही परत परत ऐकावीशी वाटणारी काही मराठी गाणी येथे आपल्याला ऐकायला मिळतील. पण प्रत्येकाची आवड आणि प्रत्येकाची निवड वेगवेगळी! आपल्याला आवडणारी गाणी निवडा आणि Play चे बटण दाबून ऐकायलाही लागा!
मराठी भूमीला प्रतिभेची कमतरता कधीच भासली नाही. जगातल्या सर्व भाषांना सरस्वतीचं वरदान असतंच पण मराठी भाषेला जरा काकणभर जास्तच आहे, असं वाटतं! समईच्या प्रकाशात, डोंगरांवरील किल्ल्यात, कोकणाच्या निसर्गात, एवढंच काय, कारागृहात पण, मराठी वाङ्मय निर्मिती अविरत चालूच राहिली आणि एकाहून एक बहारदार साहित्याची निर्मिती इथे होत राहिली. त्यातले काव्यप्रकार तर अत्यंत सरस! अभंग, गवळणी, भक्तिगीते, भावगीते, पोवाडे, नाट्यगीते, चित्रपटगीते... त्यातही नाना प्रकार. ह्या सर्वांमध्ये वीसाव्या शतकात एक कालखंड असा आला जेव्हा शब्द, सूर आणि स्वर हे प्रतिभेचे उत्तुंग पंख लावून एकत्र आले आणि अवीट गोडीची गाणी उदयास आली. हीच आपली आठवणीतली गाणी! आणि त्यातली काही निवडक गाणी तर मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होऊन राहिली आहेत, ती साठवणीतली गाणी!!
स्वरसौंदर्याने नटलेली आणि कलाकारांनी जीव ओतून आकारास आणलेली साठवणीतली ही गाणी आपल्या श्वासाशी एवढी एकरूप झाली आहेत की ती जर आपल्या आयुष्यातून वजा केली तर आपल्याला स्वतःला मराठी म्हणवण्याची लाज वाटेल! ही गाणी आज आपल्या मराठीपणाच्या अस्तित्वाची मंजुळ आणि मधूर प्रतीके आहेत.
गाण्याचं रेकॉर्डिंग कुठेही झालेलं असलं तरी आपल्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचा जन्म होतो तो आईच्या मांडीवर. तिथून मग ते गाणं आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही! वाढदिवसाला गाणं, शाळेत गाणं, सहलीत गाणं, प्रवासात गाणं, प्रत्येक देवासमोर वेगळं गाणं, प्रत्येक देवीसमोर वेगळं गाणं, सणाला गाणं, लग्नात गाणं, जीवनाच्या प्रारंभी गाणं आणि जीवनाच्या अंती गाणं, आणि काहीच प्रसंग नसेल तर रेडिओवर दिवसा गाणं आणि रात्रीही गाणं! वयोपरत्वे गाण्याची पसंती वेगवेगळी. आता हेच गाणं मोबाईलमधून प्रत्येकाच्या खिशात जाऊन बसलंय आणि तेच आता तुमच्या समोर पण आहे!
काही काही गोष्टी आपल्याला आपण 'मराठी' असल्याचा सुखद आभास देऊन जातात. दिवेलागणीला कानावर आलेलं शुभम् करोति, पंढरीच्या वाटेने निघालेली टाळ-मृदंगाची धून, कुठल्यातरी शाळेतून उच्च स्वरांत म्हटलेलं 'जयोऽस्तु ते', वाजत-गाजत गुलाल उधळत येणारा गणपती बाप्पा, घोड्यांच्या टापांबरोबर आलेली 'हर हर महादेव' ची गर्जना, साजूक तूप घातलेला वरणभात, विदर्भाच्या मसालेदार रश्याने भाजलेल्या तोंडाला शांत करणारी कोकणी सोलकढी, आणि हापूस आंब्याचा माज तर काही विचारूच नका! हे सगळं सांस्कृतिक वैभव इतरत्र पसरलं ते इथूनच. तशीच ही मराठी गाणी. ही कानावर पडली की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलात तरी आपल्या मातीची ओढ जाणवल्याशिवाय राहत नाही.
तसं पाहिलं तर सप्तसुरांचं आणि ह्या भूमीचं फार जवळचं नातं आहे. अहो, सप्तसुरांमधे सर्वात मध्यभागी येणारा 'म' म्हणजे मराठीचाच (किंवा महाराष्ट्राचा) आणि नंतर मध्यमेचा! १९५० ते १९८० ह्या काळाला मराठी संगीताचा सुवर्णकाल म्हणता येईल. आठवणीतली आणि साठवणीतली सर्व गाणी ह्याच काळातली! वसंत देसाई, वसंत बापट, वसंत कानेटकर, वसंत प्रभू, वसंत पवार, वसंतराव देशपांडे... गीतकार, संगीतकार, गायक कुठल्या ना कुठल्या रुपात हा स्वरवसंत ह्या कालावधीत बहरलेलाच राहिला. ह्या काळात असंख्य गीतरूपी लता-सुमनांची जी सुरेल उधळण झाली ती अजूनही कोमेजलेली नाही.
प्रत्येक प्रकारच्या संगीतात सात सूर तर असतातच; पण मनाला भावणाऱ्या संगीतात आणिक एक आठवा सूर असतो, त्याला कोणतेही नाव नाही, तो कागदावर लिहून दाखवता येत नाही, त्याचं स्थान असतं रसिक श्रोत्याच्या हृदयात, ज्यामुळे ते गाणं नुसतं गाणं राहत नाही, गीत हे नुसतं गीत राहत नाही, त्यामध्ये अमृताचा संचार होतो आणि ते गीत अमर होऊन जातं! हे अमृताचं धन मराठी भाषेला भरभरून मिळत आलेलं आहे.
या जगात चिरतारुण्याचे वरदान कोणाला असेल तर ते मात्र सुरांनाच असावं. पिढ्यांच्या पलीकडे या सुरांनी लोकप्रियता जपली आहे ती संगीताच्या दोलायमान लाटेवर स्वार होऊन तन-मनांना डोलवणाऱ्या त्यांच्या ताकदीवर.'रानपाखरं' चित्रपटातील जगदीश खेबूडकरांचं एक गाणं आहे - "सूर माझा मायबाप, सूर माझा देव हो, गळ्यामधी जपली मी लाखाची ही ठेव हो" हे मुळात गायलंय आशाबाईंनी, पण हे शब्द सार्थ ठरवणारे कित्येक सुरेल गळे ह्या मातीत जन्माला आले त्याची काही गणतीच नाही!
आपल्या महाराष्ट्रात अनेक दुष्काळ पडत असतात. पण संगीताचा दुष्काळ इथे कधीही पडत नाही! शांताबाई म्हणतात त्याप्रमाणे सप्त सुरांच्या घागरी इथे कायमच बरसत असतात.
शब्द धावती स्वरांमागुनी ताल धरी पखवाज
सूर लागला आज !
नकळत मिळता, जुळता तारा
सूर ओतिती अमृतधारा
अर्थ आगळा ये आकारा जमता सारा साज !
तान मुलायम येता सुस्वर
शब्द डोलती हिंदोळ्यावर
सप्त सुरांची भरली घागर बरसे वरुनी आज !
तर अशी ही रसिकांच्या स्मरणात कायमचे स्थान मिळवलेली चित्रपट, भावगीत, भक्तिगीत व लोकगीतांतील लोकप्रिय मराठी गाणी. घराला घरपण देणारी आणि मनातले मराठी संस्कार पुन्हा पुन्हा जागवणारी. एखाद्या किल्ल्याच्या प्रत्येक दगडाशी इतिहासाच्या असंख्य आठवणी निगडित असतात, तसंच गाण्याचंही! म्हणून, सर्वांची आवडती मराठी गाणी!

























0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊